वनौषधींसाठीही गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करावी अशी मागणी डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी केली. कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फौंडेशन आयोजित जागतिक जडीबुटी दिनानिमित्त आयोजित औषधी रोपं आणि भाज्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. आज वनौषधींबद्दल मोठ्या प्रमाणावर बोललं जात असलं तरी त्याचा अजूनही पुरेसा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. कोकणामध्येच जवळपास २७०० प्रकारच्या वनौषधी आढळतात. औषध निर्मितीमध्ये अशा वनस्पतींची गरज असली तरी त्याची लागवड शास्त्रशुध्द पध्दतीनं होत नसल्यानं मागणी असूनही पुरवठा होत आहे. वनौषधीच्या शेतीला प्रोत्साहन मिळाल्यास ख-या अर्थानं औषध निर्मितीची गरज भागेल अशी अपेक्षा सृष्टी अंकलेकर-गुजराती यांनी व्यक्त केली. नफेखोरीसाठी कोणत्याही उत्पादनाला हर्बलचं लेबल लावलं जातं. वनौषधींची लागवड करताना रसायनांचा वापर केला जातो. मात्र यामुळे जटीबुटीचे मूळ औषधी स्वरूप टिकवणं अशक्य आहे. सरकारनं याला वेळीच चाप लावण्याची आवश्यकता आर्य पंचगव्य चिकित्सालयाच्या डॉ. श्रीविराज वर्मा यांनी व्यक्त केली. भारत स्वाभिमान ट्रस्टचे पदाधिकारी डॉ. तुकाराम सावदेकर आणि नैसर्गिक शेतीतज्ञ विश्वास पाटील यांनी जीवामृताचे प्रात्यक्षिक दाखवले आणि औषधी वनस्पतींची माहितीही सांगितली. त्याचप्रमाणे विचरी, भारंगी, ब्रह्मदिंडी, फोडशी, शेवळं अशा रानभाज्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं.