ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये स्मार्ट ठाण्यासाठी धाव घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं असताना खड्डेमुक्त ठाण्यासाठी सुजाण ठाणेकर धावणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी दिली. स्मार्ट सिटी करायची असेल तर आधी दळणवळणासाठी महत्वाचे रस्ते स्मार्ट केले पाहिजेत, रस्ते खड्डेमुक्त केले पाहिजेत, ठाण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असल्यामुळे ठाणेकरांना त्रास सहन करावा लागत आहे. पालकमंत्र्यांच्या घरासमोरही खड्डे असून शहरातील अन्य ठिकाणची अवस्था बिकट आहे. दरवर्षी खड्डे पडतात हे खड्डे बुजवण्यासाठी निविदा काढल्या जातात. याचा अर्थ दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी ठाणेकरांचे पैसे खड्ड्यात घातले जातात. स्मार्ट होऊ पाहणा-या ठाण्यात रस्त्यांना खड्डे पडतातच कसे, चांगले रस्ते का बनवले जात नाहीत असा प्रश्न संजय घाडीगावकर यांनी उपस्थित केला असून हे प्रकार थांबायला हवेत असं म्हटलं आहे. ठाण्यातील जनता पालिकेच्या खड्डेमय कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि शहराला खड्ड्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये धावणार असल्याचं संजीव घाडीगावकर यांनी म्हटलं आहे.