राज्यातील प्रत्येक खासदारानं सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत पूरग्रस्त जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या गावांना पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक खासदारानं सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत पूरग्रस्त जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावं, जेणेकरून या गावांचं लवकर पुनर्वसन होऊन या गावातील नागरिकांना इतर सोयीसुविधा उपलब्ध होतील. खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं असून याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. यामुळं पूरग्रस्त गावातील नागरिकांना विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळणासाठी गावागावांना जोडणारे रस्ते आदी व्यवस्था पूर्ववत होण्यास विलंब लागणार नाही असं श्रीकांत शिंदे यांचं म्हणणं आहे.