भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा केला जातो. पण ठाण्यामध्ये एक स्वातंत्र्य दिन असा आहे की तो आगळा वेगळा म्हणुन लक्षात राहतो. गेली ४९ वर्ष स्वातंत्र्य दिनाचं मूल्य जपत आणि पुरेशा गांभीर्यानं तो साजरा केला जात आहे. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री बरोबर १२ वाजुन १ मिनिटांनी ध्वजारोहण करुन तिरंग्याला मानवंदना दिली जाते. हॉलमध्ये आणि अंगणात काळोख असतो. आजुबाजुचे दिवे मालवले जातात अशा वातावरणात हुतात्मा ज्योत प्रज्वलीत करुन स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या ज्ञात – अज्ञात हुतात्म्यांना मूक श्रध्दांजली अर्पण केली जाते. फटाक्यांच्या माळा, बिगुल आणि बँण्डच्या धूनवर देशभक्तीपर गीतं आणि लहान मुलांच्या हातुन तिरंगी तसेच भगवे फुगे आकाशात फोडून स्वातंत्र्याचा उद्घोष केला जातो. ठाण्यात स्वातंत्र्य दिन शासकीय, निमशासकीय तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयातुन साजरा होतो. त्याला किती कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतात हे सर्वांनाच माहिती आहे. स्वातंत्र्य दिनाला लागुन सुट्टया आल्या कि फिरायला बाहेर जाणा-यांची संख्या कमी नसते अशा पार्श्वभुमिवर मध्यरात्री साज-या होणा-या स्वातंत्र्य दिनाचं मोल अधिक आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी ७० च्या दशकात हा स्वातंत्र्य दिन साजरा करणं सुरु करुन त्याला वेगळा अर्थ प्राप्त करुन दिला आहे. आजही तितक्याच उत्साहात आणि पुरेश्या गांभीर्यांनं १४ ऑगस्टच्या मध्यरात्री साज-या होणा-या स्वातंत्र्य दिनाचं महत्व अधोरेखीत होणारं आहे. कालही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ठाणे शहर काँग्रेसच्या कार्यालयातही गेली २९ वर्ष १४ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे.