दर्याला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

ठाण्यातील शेकडो कोळी बांधवांनी कळवा येथील खाडीकिनारी जाऊन समुद्राला सोन्याचा वर्ख असलेला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली. शेकडो बांधवांनी खाडीकिनारी जाऊन सागराविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली. सागरावर अवलंबून असणा-या कोळी बांधवांचा समुद्र हाच देव आहे. वाजत गाजत आणि नाचत जाऊन त्यांनी सागराची पूजा केली आणि त्याला सोन्याचा वर्ख असलेला नारळ अर्पण केला. खवळलेल्या समुद्रानं शांत व्हावं आणि आपला व्यापार उदीम भरभराटीस यावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. कळवा पूलावर आणि आसपासच्या परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त जत्राच भरल्याचं दिसत होतं. कोळी बांधव-भगिनी आपल्या पारंपरिक वेषात तर अनेक जण नविन वस्त्र परिधान करून या जत्रेत सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेतर्फेही विधीवत नारळी पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दर्या राजा शांत हो, कोळी-मच्छीमार बांधवांना धंद्यात यश दे अशी विनवणी करत मनोभावे दर्याला नारळ अर्पण केला. या नारळाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर कळवा पूलाजवळ पारंपरिक कोळीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोळी बांधवांबरोबरच आम ठाणेकरही कोळीगीतांवर ताल धरून होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading