मुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे. मुंबई-ठाण्यातील झोपडपट्ट्यांचा विकास करून रहिवाशांना चांगलं घर मिळावं या हेतूनं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मुख्यमंत्र्यांनी गती दिली आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एकच प्राधिकरण आहे. तरी मुंबईच्या तुलनेत ठाणेकरांना दुजाभाव मिळत आहे. मुंबईमध्ये ३०० फूट म्हणजे २७.८८ स्क्वेअर मीटर क्षेत्र असलेले घर दिले जात आहे. ठाण्यात मात्र २६९ चौरस फूटाचं घर दिलं जाणार आहे. शासनाच्या परिपत्रकात ठाण्याचा उल्लेख नसल्याचं कारण पुढे केलं जात आहे. दोन्ही महापालिकांचं एकच प्राधिकरण असल्यामुळं वेगवेगळं परिपत्रक काढण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं ठाणेकरांनाही ३०० फूटाच्या घराचा लाभ मिळावा अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे.