प्रतिकुल परिस्थितीशी झगडणा-या जिद्दी एकलव्यांच्या माध्यमातून वस्ती पातळीवर वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवर अधिक समृध्द जीवन विकसित करण्याच्या उद्देशानं ठाण्यातील ८ लोकवस्त्यांमध्ये समता विचार प्रसारक संस्थेतर्फे वाचन आणि गायन कट्टा सुरू केला जाणार आहे. संस्थेच्या २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. वंचिताचा रंगमंच प्रकल्प यशस्वीपणे राबवल्यानंतर आता वस्तीतील बाल, किशोर, युवा आणि प्रौढांमध्ये असणारी वाचनाची भूक भागवण्याकरिता आणि त्यांच्यात वैचारिक समृध्दता निर्माण होण्याकरिता मनोरमानगर, महात्मा फुले नगर, खारटन रोड, कोपरी, सावरकरनगर, रमाबाई आंबेडकर नगर, चिरागनगर, मानपाडा आणि कळव्यातील महापालिका शाळा अशा ८ ठिकाणी स्वातंत्र्यदिनापासून क्रमाक्रमाने फिरती वाचनालयं सुरू केली जाणार आहेत. गायन कट्टा म्हणजे दिवसभराचं काम आटपून घरी आल्यावर संगीताची आवड जोपासण्याचा सामुहिक प्रयत्न असल्याचं लतिका सु.मो. यांनी सांगितलं. गायन कट्ट्यावर भजन, अभंग, वारकरी संप्रदायातील गाण्यांपासून फिल्मी, शाहिरी आणि चळवळीच्या गाण्यांपर्यंतची गाणी गायली जाऊ शकतील. यामुळं व्यसनात अडकण्याचे रस्ते बंद होतील असं लतिका सु.मो. यांनी सांगितले.