सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य आज पाठवण्यात आलं. जीवनावश्यक साहित्य असलेले २२ टनाचे दोन ट्रक सांगली आणि कोल्हापूरला आज रवाना करण्यात आले. पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे राहण्यासाठी ठाणेकरांनी हातभार लावावा असं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी ब्लँकेटस्, कपडे, बिस्किटे, गव्हाचं पीठ, तांदूळ, साखर, चहा, डाळी, मीठ, मसाला, पाण्याच्या बाटल्या, सॅनिटरी नॅपकिन्स, फिनेल, डेटॉल अशा जीवनावश्यक वस्तू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जमा केल्या होत्या. हे सर्व साहित्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगली आणि कोल्हापूरला रवाना केलं. ना ओळखीचे ना पाळखीचे, ज्यांना सांगली, कोल्हापूर कुठे आहे हे माहित नाही अशा लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे आभार मानले, येणा-या काळामध्ये हजार रूपयाला एक संसार म्हणजे ४ वाट्या, ४ जेवणाची ताटं, पोळपाट, लाटणं, कढई, चार भांडी, चार मोठे चमचे, १ बादली, २ मग, १ तवा अशा संसारोपयोगी वस्तू पूरग्रस्तांना पाठवल्या जाणार असून त्यासाठी ठाणेकरांनी केवळ १ हजार रूपयांची मदत करावी असं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.