सर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं – चंद्रशेखर प्रभु

सर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं असा सल्ला ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभु यांनी ठाण्यात बोलताना दिला. मतदाता जनजागरण अभियानातर्फे घर हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रभु यांनी हा सल्ला दिला. लोकप्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत कारण ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असते. चटई क्षेत्र आणि विकास हस्तांतरण हक्क याची माहिती दिली गेली पाहिजे. समूह विकास योजनेमध्ये मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे असं चंद्रशेखर प्रभु यांनी सांगितलं. स्वयंविकास हेच धोरण योग्य असून ते आपण करा म्हणजे आपणास ३३३ काय पण ६०० फूटाचं घरही मिळू शकते असं सांगून अशा कामास भेटी द्या आणि मग निर्णय करा. नागरिकांची एकजूट हाच उपाय असून कुठेही सह्या करू नका असं आवाहन चंद्रशेखर प्रभु यांनी यावेळी बोलताना केलं. सुनिल दिघे यांनी कायदेविषयक तरतुदी आणि धोक्याचे इशारे समजावून सांगितले. समूह विकास योजना जनतेच्या हिताची नसेल तर त्यास आमचा विरोध राहील, स्वयंविकास करण्याचा आमचा निर्धार आहे असा ठराव या परिषदेत करण्यात आला. त्याचबरोबर मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे. विस्थापित होणा-या सर्वांना हमीपत्र मिळावी, बांधकामाच्या सर्व परवानग्या आणि पर्यायी निवारा मिळाल्याशिवाय इमारत तोडू नये, हक्काच्या घराचा करार स्थानिक निवासी, बांधकाम व्यावसायिक आणि महापालिका असा करावा अशा प्रकारचे विविध १० ठराव मंजूर करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading