पोलीस ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या महिला तक्रार निवारण दिनात 27 महिलांना न्याय मिळाला आहे. महिलांवरील अत्याचार, महिलां संबंधांतील गुन्हेगारी वाढली अशी सारखी ओरड केली जाते आणि पोलिसांना दोष दिला जातो. मात्र ठाण्यात वर्तकनगर पोलिसांनी महिलांच्या संबंधांतील तक्रारींचे तात्काळ निवारण कराण्याकरता विशेष महिला तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आणि अनेक त्रासलेल्या 27 महिलांच्या चेह-यांवर तक्रार निवारणाचा आनंद झळकला.पोलीस ठाणे म्हटले की भल्याभल्याना घाम फुटतो.घरी पोलीस आले तरी,समाजात काय प्रतिमा उमटेल याच्या चिंतेने कपाळावर आट्या उमटतात.यासाठी बहुतांश जण पोलीस ठाण्यात जाणे टाळतात. महिला तर पोलीस ठाण्याचे नाव घेताच घाबरून जातात.हे टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार वर्तकनगर पोलिस ठाण्यात शनिवारी आयोजित केलेल्या महिला तक्रार निवारण कार्यक्रमात 27 तक्रारदार महिलांशी संवाद साधून पोलिसांनी तक्रारी जाणून घेतल्या.तसेच,त्यांच्या तक्रारी तातडीने मार्गी लावण्यात आल्याने या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.बऱ्याचशा तक्रारी घरगुती भांडण, शेजाऱ्यांशी वाद यासारख्या होत्या.एका तक्रारदार महिलेचा पाठलाग होत होता.मात्र,पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पाठलाग करणाऱ्याला पोलिसांनी समज दिल्यानंतर त्याने माफी मागितल्याने हा त्रास कमी झाल्याचे सांगितले.एकीला सासरच्या मंडळीकडून त्रास होता,पतीही नांदवत नव्हता.अखेर,पोलिसांनी यात हस्तक्षेप करताच पतीने स्वीकार केला.अशीही प्रतिक्रिया मनीषा गुप्ता या गृहिणीने दिली. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच महिलांचा त्रास कमी होऊन समाजात अप्रिय घटना टळाव्यात. यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात महिला तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करून 27 महिला तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण केले. अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.