कल्याण ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय मंजूर करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मकता दाखवली आहे अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी विधी महाविद्यालयांची संख्या अपुरी आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहराकडे यावं लागतं. त्यातच जिल्ह्यामध्ये विधी महाविद्यालयांची संख्या कमी असल्यामुळं विद्यार्थ्यांना मुंबईला जावं लागत असे. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी भिवंडी ग्रामीण भागात विधी महाविद्यालय मंजूर करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कल्याण भागात येणा-या टिटवाळा, मुरबाड, शहापूर, कसारा बदलापूर आदी भागातील विद्यार्थ्यांसाठी विधी महाविद्यालय मंजूर करण्यात आलं होतं. मात्र या महाविद्यालयाची क्षमता कमी असल्यामुळं ग्रामीण भागात आणखी एका विधी महाविद्यालयाची आवश्यकता होती. आमदार निरंजन डावखरे यांनी आणखी एक महाविद्यालय सुरू करण्यासाठी उच्चतंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. या मागणीबाबत तावडे यांनी सकारात्मकता दाखवल्यामुळं ग्रामीण भागात आणखी एका विधी महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.