जि.प.शाळांचे वीजबील ग्रामपंचायत भरणार

बील न भरल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज तोडण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने केलेल्या पाठपुराव्याला तसेच आ. संजय केळकर यांच्या अधिवेशनातील मागणीला यश आले आहे. यापुढे या शाळांचे वीजबील ग्रामपंचायत भरणार असून तसे परिपत्रक काढण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे वीजबील न भरण्यात आल्याने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. अशा पध्दतीने राज्यातील प्राथमिक शाळांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने शिक्षक परिषदेचे संस्थापक आ.संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकार्‍यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांची भेट घेतली. या समस्येबाबत त्यांच्याशी चर्चा करुन निवेदनही देण्यात आले होते.शिक्षक परिषदेकडून पाठपुरावा सुरु असताना आ. संजय केळकर यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्‍न उपस्थित करुन या समस्येला वाचा फोडली. तर दुसर्‍याच दिवशी रायगड जिल्हा परिषद शाळांचे वीजबील ग्रामपंचायतीने भरावे असे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हळदे यांनी काढले. त्यामुळे या शाळांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading