ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नानं अखेर १६० कुटुंबांना हक्काची घरं मिळाली आहेत. ठाण्यातील धर्मवीर नगर येथील सत्यम् आणि सुंदरम् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये ही १६० कुटुंबं राहत होती. या दोन्ही इमारती महापालिकेनं ३ वर्षापूर्वी धोकादायक ठरवल्यानं त्यांना मानपाडा येथील दोस्ती रेंटलमध्ये हलवण्यात आलं होतं. पण हक्काच्या घरांसाठी त्यांची वणवण सुरूच होती. अनेकवेळा पाठपुरावा करूनही कोणी दाद देत नसल्यानं हतबल आणि निराश मनानं त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. आमदार केळकर यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिका-यांशी याबाबत चर्चा करून १६० कुटुंबांना तुळशीधाम येथे बांधलेल्या बीएसयुपी इमारतीमध्ये कायमस्वरूपी हक्काची घरं मिळावीत अशी मागणी करून त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळं या १६० कुटुंबांना तुळशीधाम बिल्डींग नंबर १७ मध्ये कायमस्वरूपी हक्काची घरं मिळाली आहेत. याबद्दल या १६० कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांचा सपत्नीक सत्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त केली.