ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावत आहे. ठाण्यात सक्रीय असलेल्या टँकर लॉबीमुळेच धरणाचा प्रश्न सत्ताधारी मार्गी लावत नाहीत. पाणी सोडणारे व्हॉल्व्ह ऑपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करत आहेत. त्यामुळं ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरातील नालेसफाई आणि पाणी टंचाईच्या बाबतीत आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत घेऊन शहरातील नालेसफाईचा गोंधळ आणि पाणी वाटपातील भ्रष्टाचाराचा पंचनामा केला. पाण्यासाठी आरडाओरड केवळ गरीबांच्या चाळीतून आणि झोपडीतूनच केली जाते असा दावा करणा-यांना यावेळी हिरानंदानी मिडोजच्या सेक्रेटरी अर्चना वैद्य यांनी चपराक लगावली. यावेळी त्यांनी वर्षाचे १२ महिने आणि २४ तास पाण्याची टंचाई भेडसावत असून टँकरशिवाय पर्यायच नसल्याचं सांगितलं. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला असून दिवा, मुंब्रा, कळवा, नौपाडा, वागळे, घोडबंदर या सर्वच भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक ठिकाणी टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. २५ वर्षाच्या सत्तेत पाणी कुठे मुरले हे सत्ताधा-यांनी जाहीर करावं. सध्या ठाण्यात टँकर लॉबी कामाला लागली असून हे टँकर कोणाचे आहेत याची चौकशी करण्यात आली पाहिजे. सध्या ज्या धरणांचे पाणी ठाणेकरांना मिळत आहे त्या धरणांमध्ये १८ ते २० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. जर पालिकेचं स्वत:च्या मालकीचं धरण असतं तर ही वेळ आलीच नसती. मात्र पाण्याच्या वाटपावर काहीजणांची दैनंदिनी चालत आहे. त्यातून त्यांच्या नेत्याला हप्ते मिळत आहेत त्यामुळंच धरण बांधलं जात नाही असा आरोपही आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक येत्या सर्वसाधारण सभेत धरणाबाबत विचारणा करणार असून अपेक्षित उत्तर न मिळाल्यास एकही सर्वसाधारण सभा होऊ न देण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.