पदपथावर उभारण्यात आलेल्या आंबा विक्री केंद्रावर कारवाई करण्याच्या मागणीवरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार जुंपली. यावरून निर्माण झालेल्या वादावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला. ठाण्यातील विष्णूनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाजवळील पदपथावर आंबा विक्रीचं केंद्र सुरू आहे. शेतक-याला त्याचा आंबा थेट ग्राहकाला विकता येऊन त्याचा फायदा शेतक-याला मिळावा यासाठी गेली तीन वर्ष आंब्याच्या मोसमात हे विक्री केंद्र उभारलं जातं. मात्र यंदा प्रथमच भारतीय जनता पक्षानं या विक्री केंद्राला विरोध दर्शवला. एका ज्येष्ठ नागरिकाला चालताना आंब्याची पेटी लागल्यावरून हा विरोध सुरू झाला. बराच वेळ यावर वादावादी सुरू होती. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचं म्हणणं आत्ताच कारवाई करावी असं होतं तर यावर उद्या कारवाई करू असं पालिकेचं म्हणणं होतं. यावरून वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी सुरू झाली. पालिका प्रशासनानं विक्री केंद्रावर कारवाई करून सर्व सामुग्री जप्त केली. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रास्ता रोको केला. दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात जोरदार आणि अर्वाच्य घोषणाबाजी होत होती. यातूनच वाद नियंत्रणात येत नसल्याचं लक्षात येताच पोलीसांनी समजावूनही न ऐकल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. लाठीमार केल्यावर कार्यकर्त्यांमध्ये पांगापांगी झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनेश जोशी हेही या लाठीमारातून सुटले नाहीत.