महावितरणच्या अटी शर्थींनी त्रस्त झालेल्या राज्यातील १० हजाराहून जास्त वीज बील भरणा केंद्राचा तिढा सुटला आहे. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वीज बील भरणा केंद्र चालकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ठाण्यामध्ये महावितरणची १० तर राज्यात १० हजार वीज बील भरणा केंद्र आहेत. गेले काही दिवस ही केंद्रं महावितरणच्या अटी-शर्थींमुळे बंद होती. महावितरणनं केंद्र चालकांना लेझर प्रिंटर घेणं बंधनकारक केलं होतं. केंद्राचं कमिशन वाढवण्याची केंद्र चालकांची मागणी होती. त्याचप्रमाणे कमिशनही ३-३ महिने मिळत नव्हतं. केंद्र चालकांच्या विविध समस्यांवर शिष्टमंडळानं चर्चा केल्यानंतर केंद्र चालकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. केंद्र चालकांना प्रिंटरसाठी ५० टक्के अनुदान दिलं जाणार, कमिशन ७ दिवसात अदा केलं जाणार आणि कमिशनबाबतही १० जूनपूर्वी निर्णय घेतला जाणार तसंच प्रिंटरला लागणारा थर्मल पेपर महावितरणतर्फे दिला जाणार आहे. या निर्णयामुळे केंद्र चालकांना दिलासा मिळाला आहे.