जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संथगतीनं मतदान

जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान सुरू झालं. मतदान प्रक्रियेसाठी २७ हजाराहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र मतदान अतिशय संथगतीनं होत असल्यामुळं अनेक मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं. यातून ठाण्यातील राजकीय नेतेही सुटले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे लोकसभेचे उमेदवार आनंद परांजपे, आमदार जितेंद्र आव्हाड यांना जवळपास तास ते दीड तास रांगेत उभं राहिल्यानंतरच मतदान करता आलं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मतदान केलं. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांनीही सहकुटुंब मतदान केलं. महापालिका आयुक्तांनीही सहकुटुंब मतदान केलं. आमदार संजय केळकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनीही मतदानाचा आपला हक्क बजावला. जिल्ह्यात ६२ लाख २५ हजार १९४ मतदार आहेत. या मतदारांसाठी जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ७१५ मतदान केंद्रं निर्माण करण्यात आली होती. मतदान केंद्रांमध्ये काही ठिकाणी गोंधळ दिसून आला. एकाच इमारतीत असलेल्या मतदान केंद्रात काही ठिकाणी गर्दी तर काही ठिकाणी मतदारच नसल्याचं दिसत होतं. महाराष्ट्र विद्यालयात तीन मतदान केंद्रं होती. त्यापैकी तिस-या मतदान केंद्रात मतदारांची रांग होती. तर बाकी मतदान केंद्रं रिकामी दिसत होती. बहुतांश ठिकाणी असंच चित्र दिसत होतं. यंदा व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आल्यामुळं मतदान प्रक्रिया ही संथ झाली. त्याच्या परिणामामुळे मतदान केंद्रांवर अतिशय संथगतीनं मतदान होत असल्याचं चित्र दिसत होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading