लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये जरी आघाडी झाली असली तरी काँग्रेसमधील गटबाजीमुळे त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी बहिष्काराचं अस्त्र उगारलं होतं. मात्र हे बंड काही दिवसांनी थंड झालं. पण काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी मात्र सुरूच असल्याचं दिसत आहे. काँग्रेसमध्ये मनोज शिंदे आणि पूर्णेकर असे दोन गट आहेत. त्यांचं एकमेकांशी शह-काटशहाचं राजकारण सुरूच आहे. त्याचा फटका बसू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे टिप टॉप हॉटेलमध्ये एका समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक आले होते. त्यावेळी काँग्रेसमधील पदाधिका-यांना या बैठकीला दूरध्वनी करून बोलवून घेण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये गणेश नाईक काँग्रेसमधील गटबाजी दूर करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र या बैठकीतच काँग्रेसच्या दोन गटात वादावादी झाली. ही बैठक गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न होता. या बैठकीत राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे ठराविक वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीला पूर्णेकर गटातील काही पदाधिकारी हजर झाले. त्यावेळी त्यांना या बैठकीतून बाहेर काढण्यात आलं. बैठकीमध्ये पूर्णेकर गट आणि मनोज शिंदे गट यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. पण पूर्णेकर गट समजावून सांगूनही शांत न झाल्यानं अखेर या बैठकीतून त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता दिसत आहे.