जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत संपूर्णत: महिला आणि दिव्यांगांनी संचलित केलेली मतदान केंद्रं उभारली जाणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यामध्ये ठाणे, कल्याण आणि भिवंडी असे लोकसभेचे ३ मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघात संपूर्णत: महिला आणि दिव्यांगांनी संचालित मतदान केंद्रं उभारली जाणार असून राज्यामध्ये ठाण्यात सर्वाधिक अशी मतदान केंद्रं असावीत असा प्रयत्न असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं. महिलांच्या मतदान केंद्रामध्ये सर्व कर्मचारी हे महिला तर दिव्यांगांच्या मतदान केंद्रांमध्येही सर्वच्या सर्व कर्मचारी दिव्यांग असतील असंही यावेळी सांगण्यात आलं. जिल्ह्यामध्ये विधानसभेचे १८ मतदारसंघ असून किमान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक तरी असं विशेष मतदान केंद्र असावं असा प्रयत्न असल्याचंही जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.