जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत २२७ नं वाढ

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी अगदी अंतिम टप्प्यापर्यंत मतदार नोंदणी होत असल्यामुळं जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत २२७ नं वाढ झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी केली जाते. मतदार नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यानं मतदान केंद्रं वाढवण्यात आल्याचं जिल्हा निवडणूक अधिका-यांनी सांगितलं. लवकरच पुरवणी मतदार यादीही प्रसिध्द केली जाणार असून मतदान कर्मचा-यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच दुसरा टप्पाही सुरू होणार आहे. दुस-या टप्प्यात कर्मचा-यांना गटागटानं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होत असल्यामुळं कर्मचा-यांना समजण्यासाठी छोटे छोटे गट करून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला असून मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेले जे कर्मचारी प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिले अशा ५ हजार ४०० कर्मचा-यांना नोटीसा काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं. जिल्ह्यासाठी मिळालेली मतदान यंत्रं ही अद्यावत असून यामध्ये व्हर्जन थ्रीची आज्ञावली वापरण्यात आली आहे. त्यामुळं ५० अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात ही यंत्रं काम करू शकतात अशी माहितीही जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading