आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देणं वा अन्य हेतूने केल्या जाणा-या प्रकारांना आळा घालण्यासाठी बँकांमधून होणा-या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यात येणार आहे. असे संशयास्पद व्यवहार बँकांनी तात्काळ निवडणूक यंत्रणेस कळवावेत असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व बँकांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व बँक अधिका-यांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. ज्या आर्थिक व्यवहारातून उलाढाल होणारी रक्कम ही मतदारांना लाच आणि प्रलोभन देण्यासाठी वापरली जाऊ शकते अशा सर्व संशयास्पद व्यवहारांवर बँकांमार्फत नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यातून रोख रक्कम काढली गेल्यास, १ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करणे अथवा काढणे, एकाच वेळी एका विशिष्ट खात्यातून अनेक व्यक्तींच्या खात्यावर रक्कम हस्तांतरीत होणं, उमेदवारांच्या अवलंबित व्यक्तीच्या खात्यातून १ लाखांपेक्षा अधिक रक्कमांचे व्यवहार होणं याबाबत बँकांनी तात्काळ माहिती द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त १० लाखांपेक्षा अधिक व्यवहारांची माहिती आयकर विभागास द्यावी, बँकांची रोकड वाहतूक करणा-या वाहनांची माहिती, कागदपत्रं वाहनांसोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. रोकड वाहतूक करणा-या कर्मचा-यांनी ओळखपत्र बाळगणं त्याचबरोबर निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खातं उघडण्याकरिता उमेदवारांना तत्पर सेवा देण्याच्या सूचनाही जिल्हाधिका-यांनी केल्या आहेत.