राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत राष्ट्रीय स्तरावर राज्यातून ३० प्रकल्प निवडले गेले असून यामध्ये ठाण्याचे ७ प्रकल्प आहेत. या ७ प्रकल्पात सरस्वती सेकंडरी स्कूलचे ३ प्रकल्प आहेत. एका पत्रकार परिषदेत बालविज्ञान परिषदेचे संयोजक सुरेंद्र दिघे यांनी ही माहिती दिली. सरस्वती सेकंडरी स्कूलचा काजळीपासून शाई बनवण्याचा प्रयोग विराजित फुंदे आणि निविदा पगारे यांनी सादर केला असून हा प्रकल्प चर्चेचा विषय ठरला आहे. याच शाळेच्या तन्मय महाजन आणि वेदांत मुळे यांनी शाश्वत गतीचे विद्युत उर्जेत रूपांतर करणारा प्रयोग सादर केला आहे. देवांशी गायकवाड आणि शुभा चव्हाण यांनी प्लाँट फायबर इज द न्यू प्लास्टीक, सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलच्या अनुष्का निंबाळकर आणि शिवम् शेट्टी यांनी समजूया झाडाचे शास्त्र सोडवूया तणाचे रहस्य, डॉ बेडेकर विद्यामंदिरच्या मृण्मयी भोसले आणि तन्मयी भोसले यांनी घरपोच अन्नपदार्थासाठी वापरल्या जाणा-या प्लास्टीक कंटेनरला पर्याय, श्रीरंग इंग्रजी माध्यम शाळेच्या सारा शेख आणि हसीब काझी यांनी झुरळांचे मानवी आरोग्य आणि स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम तसंच त्यावरील नियंत्रण सुचविणारा प्रयोग सादर केला आहे.