जिल्ह्यातील नद्या वाहत्या राहण्यासाठी तसेच प्रदुषण विरहित करण्यासाठी काय काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात ‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत रोड मॅप तयार करावा. तसेच सर्व विभागांनी यासंदर्भात पुढील बैठकीत कृती आराखड्याचे सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची जिल्हास्तरीय पहिली बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ‘चला जाणूया नदीला’ या अभियानामध्ये जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी, कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोर नदी, लेणाड नदी या नद्यांचा समावेश आहे. या नद्यां पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच त्या वाहत्या करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे. तसेच शास्त्रीय दृष्टिकोनातून काय करता येईल याबाबतही विचार करावा. नद्यांच्या पूररेषा निश्चित करण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी. त्या पुररेषातील अतिक्रमणे हटविण्यासाठी कायदेशीर उपाय योजावे लागतील. नद्यांच्या किनाऱ्यावरील उद्योगांकडून होणारे दुषित सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आणि दुषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यासाठी कडक उपाय योजावेत. तसंच नद्यांच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देता येईल का यासंदर्भात नियोजन करावे. पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्यासाठीही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात यावेत. प्रदुषणासंबंधी गावातील नागरिकांचे विशेषतः महिलांची जनजागृती करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे अशा सूचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या.