टिकली संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी केवळ महिला पत्रकारांचीच नव्हे तर समस्त महिलांची माफी मागावी अशी मागणी आज ठाणे महिला पत्रकारांनी केली. यासंदर्भाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले असून हे निवेदन आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले. टिकली वरून सध्या सर्व स्तरातून मतमतांतरे व्यक्त होत असताना राज्यात सर्वप्रथम ठाण्यातील महिला पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट करत संताप व्यक्त केला आहे. मंत्रालयात एक महिला पत्रकार संभाजी भिडे यांना प्रश्न विचारत असताना ‘तू आधी कुंकू लावून किंवा टिकली लावून ये, मग तुझ्याशी बोलेन. स्त्री ही भारत माता आहे आणि भारत माता विधवा नाही असे वक्तव्य केले. पुरोगामी महाराष्ट्रात असे वक्तव्य करणे ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्य बाब आहे. एखाद्या महिलेने टिकली लावावी की नाही हा संपूर्णपणे तिचा वैयक्तिक अधिकार आहे. अशावेळी संभाजी भिडे यांचे वक्तव्य समस्त महिलांचा अपमान करणारे आहे. अशा शब्दात ठाणे महिला पत्रकारानी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. कपाळावरील टिकली टीकण्यापेक्षा महिलेची अस्मिता टिकणे गरजेचे आहे. सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्यामुळे कर्तुत्व बघितलं गेलं पाहिजे. असे मत महिला पत्रकारांनी व्यक्त केले. तसेच अश्या प्रकारचे बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी जाहीर माफी मागावी आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही अशी दखल घ्यावी अशी मागणी महिला पत्रकरांकडून करण्यात आली आहे. ठाण्यातील महिला पत्रकारांनी #माझीटिकली #माझीमर्जी हा hashtags सोशल मीडियावर सुरू केलेला आहे आणि भारतातील सर्व महिला पत्रकारांनी देखील ह्यात सहभाग घेत भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करावा असे आवाहन केले आहे.