जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्या कडे तिन मंत्र्यांनी कृषी महोत्सवाकडे पाठ फिरवल्यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन उरकून घेण्याची वेळ कृषी अधिकाऱ्यांवर आली.कृषी महोत्सवाची तयारी गेल्या महिन्यापासून सुरू होती. त्यामध्ये कृषिमंत्री सदाभाऊ खोत, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना या महोत्सवाचे निमंत्रण देवून त्यांच्या वेळा निश्चित केल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐनवेळी हे तिन्ही मंत्री याठिकाणी आलेच नाही. त्यातच कृषी विभागाकडून या महोत्सवात सत्कार करण्यात येणारे शेतकरी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी येवून बसले होते. या शेतकऱ्यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याने काही शेतकरी कुटुंबासह आले होते. दुपारी १ वाजता होणारे उद्घाटन तब्बल दीड तासांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहिर झालेल्या शेतकऱ्यांचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय आत्मा अंतर्गत गट राजमाता शेतकरी स्वयंसहायता गट, कृषिभूषण शेतकरी स्वयंसहायता गट, समर्थ सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गट, सप्तशृंगी शेतकरी गट यांचादेखील सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कल्याण, शहापूर, मुरबाडच्या १३ शेतकऱ्यांना गौरवण्यात आले.