कन्याकुमारी एक्सप्रेसच्या ठाण्यातील थांब्यावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये उफाळला श्रेयवाद

कन्याकुमारी एक्सप्रेसला ठाण्यात थांबा मिळवण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद उफाळला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांनी काल आपल्या प्रयत्नामुळे थांबा मिळाल्याचा दावा केला होता. तर खासदार राजन विचारे यांनीही आपल्या प्रयत्नामुळे कन्याकुमारी एक्सप्रेस ठाण्यात थांबल्याचं म्हटलं आहे. ठाण्यात थांबा मिळावा यासाठी २०१४ पासून रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अधिकृत पत्र देऊन ठाण्याच्या थांब्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. या गाडीनं काल ठाणे स्थानकात थांबा घेतल्यानंतर त्याचं स्वागतही खासदार राजन विचारे यांनी केलं होतं. खरंतर राज्यातल्या राज्यात धावणा-या अनेक गाड्यांना ठाण्यात थांबा मिळावा यासाठी प्रवाशांची मागणी आहे. मात्र त्याकडे कोणाचंच लक्ष नसून राज्याबाहेरील गाड्यांना मात्र ठाण्यात थांबा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचं दिसत आहे. रेल्वे प्रशासनही ठाण्यात थांबा देण्यासाठी उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकाचं कारण पुढे करत असतं. पण त्याचवेळी राज्याबाहेरील गाड्यांना थांबे देताना मात्र कोणतीच अडचण येत नाही याबाबत प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading