गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेस वाढता प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये ७५ टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. जिल्हाधिका-यांनी लसीकरणासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत कौसा, मुंब्रा, भिवंडी भागात लसीकरणाचं महत्व अधिक परिणामकारकरित्या पटवून देण्यासाठी पालिकांनी पालक-शिक्षकांना विश्वासात घ्यावं अशी सूचना केली. जिल्ह्यामध्ये २६ लाख ८५ हजार मुला-मुलींना ही लस द्यायची असून आत्तापर्यंत २० लाखाहून अधिक मुलामुलींना ही लस देण्यात आली आहे आणि यामुळे कोणालाही त्रास झाला नसल्याचं सांगण्यात आलं. या लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात ८८ टक्के लसीकरण झालं आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ८१ टक्के म्हणजे २ लाख ८५ हजार तर ठाणे महापालिका क्षेत्रात ६२ टक्के म्हणजे ३ लाख ६३ हजार तर सर्वात कमी भिवंडी पालिका क्षेत्रात ४२ टक्के म्हणजे ९२ हजार ९३४ मुला-मुलींचं लसीकरण झालं आहे. शाळाबाह्य मुलं किंवा मजूर वस्त्या, तांडे या ठिकाणी देखील कोणी लसीकरणापासून सुटू नये म्हणून आखलेल्या मोहिमेत ६ लाख ७८ हजारापैकी ३ लाख २९ हजार मुलामुलींना लस देण्यात आली आहे.