घोडबंदर रस्त्यावर होणा-या वाहतूक कोंडीवर तात्काळ मार्ग काढावा अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा पालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. घोडबंदर रस्त्यावर सध्या मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यावर उपाय काढणं सोडाच पण ही कोंडी कशी फुटेल यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मेट्रोच्या कामासाठी विविध ठिकाणी रस्त्यांवर पत्रे लावून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळं वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हे काम सुरू असतानाच महापालिकेतर्फेही जल आणि मलनिस्सारण वाहिन्यांचं काम केलं जात आहे. मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळं वाहन चालक सेवारस्त्यांचा वापर करत आहेत. पण हे सेवा रस्ते आधीच पार्कींगनं फुल झाले आहेत. मेट्रोचं काम करणा-या रिलायन्सचे कर्मचारी प्रशिक्षित नसल्यानं या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यातच आता दहावी-बारावीची परीक्षा सुरू होणार असून अशावेळी वाहतूक कोंडी सुरूच राहिली तर जनतेचा उद्रेक होण्याचा धोका असून यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.