ठाणे पूर्व भागात असणाऱ्या कोपरी येथील शांतीनगर रस्त्याचे विकास योजनेतील रस्त्याचे नियोजन रद्द करून त्या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागी करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली आहे. आणि त्यामुळे डी.पी. रस्ता रद्द झाला की स्थानिकांना देखील गैरसोय होणार नसल्याचे ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरू शकेल असे यावेळी सांगण्यात आले. झोपडपट्टी असलेला हा भाग विकसित होण्यासाठी देखील मदत होईल असे मत यावेळी भरत चव्हाण यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील 1994 साली सुधारित विकास योजना तयार करताना, शहर विकासाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन प्रस्तावित रस्त्याचे जुन्या ठाणे शहरकरिता अस्तित्वावरील रस्त्याचे रुंदीकरण आणि नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे. याचे नियोजन करताना अस्तित्वातील जमिनीचा वापर हा संदर्भ विचारात घेणे अत्यंत आवश्यक असून शांतीनगर येथे नव्याने बनवण्यात येणाऱ्या डी.पी. रस्त्याच्या कामांचे नियोजन त्वरित रद्द करावे अशी मागणी स्थानिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केली आहे. तसेच सुधारित विकास योजनेमध्ये शांतीनगर जंक्शन ते दत्ताविजय सोसायटीला जोडणारा विकास योजना रस्ता हा प्रत्यक्षात निर्मिला जाऊ शकत नाही. या जागी झोपडपट्टीने व्यापलेले परिसर असल्याने त्या जागेवर रस्त्याचे नियोजन करण्यात आले नसून, 300 हुन अधिक झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागी करून रस्त्याचे नियोजन रद्द करावे अशी मागणी चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली आहे.