ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या १० जलतरण पटूंनी मोरा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे १६ किलोमीटरचं अंतर वैयक्तीकरित्या यशस्वीपणे पूर्ण करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महापौर मिनाक्षी शिंदे यांनी सर्व जलतरण पटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रविवारी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जलतरण मोहिमेत मानव मोरे, आशय दगडे, वेदांत गोखले, हर्ष पाटील, नितीन मेनन, नील वैद्य, आर्यन डोके, सर्वेश डोके, ईशा शिंदे तसंच कोल्हापूरचा साईश चौगुले हे जलतरण पटू सहभागी झाले होते. सकाळी पावणे दहा वाजता या जलतरण पटूंनी समुद्रात झेप घेतली. मानव मोरेनं २ तास २५ मिनिटं १० सेकंदात हे अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. गेटवे ऑफ इंडिया येथे या जलतरण पटूंचं आशिष शेलार आणि निरंजन डावखरे यांनी स्वागत केलं. हे सर्व जलतरण पटू कैलास आखाडे आणि अतुल पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली मारोतराव शिंदे तरण तलावात सराव करतात.