राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोपरी येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 20 मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कचऱ्याची समस्या जगात सर्वत्र भासत असून वाढत्या शहरीकरणाबरोबरच कचरा देखील वाढत जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे पूर्व विभागात कचरा कुंडीमुक्त कोपरी अशी नवी संकल्पना आखण्यात आली आहे. आज गांधी जयंतीचं औचित्य साधून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तसेच यावेळी कोपरी येथे एकही कचरा कुंडी दिसणार नाही अशी शप्पथ घेण्यात आली. “कचराकुंडी मुक्त कोपरी” या नव्या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला असून कोपरी मधील सर्व कचरा कुंडी हटवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्व शहरे कचरा मुक्त होत आहेत. प्रत्येक शहरांनी कचऱ्याचे योग्य पध्दतीने नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कचरा कुंडी मुक्त अभियानाला सुरुवात झाली आहे. सद्या कोपरी येथे एकूण 12 कचरा कुंडी आहेत. नागरिक कचरा कुंडीसह बाहेर कचरा फेकत असतात, त्यामुळे शहर विद्रुप दिसून येत असून नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होत असतो. याच पार्श्वभूमीवर एकही कचरा कुंडी कोपरी येथे न ठेवता दिवसातून घंटागाडीच्या 3 ते 4 फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचे ठाणे पालिकेचे अधिकारी बालाजी हळदेकर यांनी सांगितले. रस्त्यावर कचरा फेकणे ही नागरिकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे आपल्या दारात नको मात्र दुसऱ्याच्या दारात कचरा फेकणे ही जणू माणसाची मानसिकता तयार झाली आहे. यालाच छेद देण्यासाठी नागरिकांनी देखील आपला कचरा योग्य त्या वेळी दररोज येणाऱ्या घंटागाडी मध्ये टाकावा असे आवाहन भरत चव्हाण यांनी केले आहे.