ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला वचननामा प्रसिध्द केला आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर अशा तीन शहरांसाठी या वचननाम्यात स्वतंत्र वचनं देण्यात आली आहेत. या वचननाम्यात ठाण्यासाठी मनोरूग्णालया जवळील नवीन स्थानक प्रवाशांसाठी सुरू करणं, एसी रेल्वे डबे सुरू करणं, उपनगरीय रेल्वेच्या १५ डब्यांच्या गाड्या सुरू करणं, मध्य रेल्वेवर सिग्नल रेल्वे नियंत्रण प्रणाली बसवण्यामुळे रेल्वेच्या दोन फे-यांमधील कालावधी २ मिनिटांनी कमी करणं, कल्याणकडील पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम करणं, ठाणे स्थानकातून मुंबई आणि कल्याण कडील दिशेला जलद गाड्या सुरू करणं, घाटकोपर-कासारवडवली मेट्रो मार्गिकांसाठी लोकार्पण करणं अशी आश्वासनं या वचननाम्यात देण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोपरी पूलाचं काम दोन वर्षात पूर्ण करणं, ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचं काम पूर्ण करणं, घोडबंदर बायपास, गायमुख ते साकेत खाडी किनारी रस्त्याला वाढीव निधी उपलब्ध करून देणं, शहरातील खाडी किना-यावरून जलवाहतूक सुरू करणं, ५०० चौरस फूट घरांना मालमत्ता करातून सवलत देण्यासाठी प्रयत्न करणं, पोलीस वसाहतींमधील पाण्याचा प्रश्न सोडवणं अशी अनेक आश्वासनं या वचननाम्यात देण्यात आली आहेत.