ठाणे शहरातील नाल्यांची सफाई 75 टक्के झाली आहे. महापालिका आयुक्तांनी काल शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली, त्यावेळी नाल्यांची सफाई 75 टक्के झाले असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे पावसाच्या पुरात रस्त्यावरुन लावण्यासाठी लोखंडी खांब उभारून त्याला दोरी बांधावी आणि नागरिकांनी ही दोरी धरून रस्ता ओलांडावा असा सल्ला महापालिकेने दिला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रखरखत्या उन्हात वेळप्रसंगी पायी चालत शहरातील नालेसफाई,फुटपाथ दुरुस्ती,सेवा रस्ते आणि मेट्रो कामाची पाहणी करून पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही तसेच कुठलीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. त्याचबरोबर उर्वरित नालेसफाईची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी घनकचरा विभागास दिले. महापालिका आयुक्तयांनी पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट,तीन हात नाका येथील पनामा नाल्यापासून नाले सफाई कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मुलुंड चेक नाका येथील बीएमसी नाला, विक्रांत सर्कल मार्गे साईराज नाला, आयटीआय नाला, टीएमटी डेपो जवळील नाका, दालमिल नाका, साईनगर नाला, इंदिरानगर नाका, मराठा हॉटेल नाला, नितीन सिग्नल, नळपाडा,बटाटा कंपनी, ऋतू एन्क्लोव्ह नाला, भाईंदर पाडा आणि गायमुख येथील नाल्याची पाहणी केली.यावेळी त्यांनी नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, नाल्याची खोली वाढविणे,प्रवाहातील अडथळे दुर करणे,संरक्षक कठडा बांधण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. पाणी साचणाऱ्या ठिकाणी उच्च क्षमतेच्या पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निपटारा करण्यसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितल्या.या पाहणी दौ-यात त्यांनी सर्व ठिकाणच्या मेट्रोच्या कामाची पाहणी केली.मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी बॅरिकेटिंगमुळे पाणी साचण्याची शक्यता असल्याने पाणी अडणार नाही याची काळजी घेत कोरम मॉल, तसेच मानपाडा येथील बॅरिकेटिंग पावसाळ्यात तात्काळ हटविण्याच्या सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पालिका आयुक्तांनी सेवा रस्त्यांची पाहणी करून रस्त्यावरील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.