ठाणे महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असतानाही शिवसेनेला वाहतूक कोंडी सोडवता आली नाही याचा फटका त्यांच्याच नेत्यांना बसला. त्यामुळं आपण ठाणेकरांसह सत्ताधा-यांच्या वतीनं त्यांची माफी मागतो अशी उपहासात्मक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात उध्दव ठाकरे यांची सभा झाली. या सभेपूर्वी कल्याण येथेही सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याणहून ठाण्यात येताना उध्दव ठाकरे यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ठाकरे यांना सभास्थानी येण्याकरिता २ तास उशीर झाला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून ही उपहासात्मक टीका केली. ठाणे ते घोडबंदर प्रवासासाठी १ ते दीड तास तर शीळफाटा -ठाणे प्रवासासाठी २ तास वाया जातात. यावर उपाय करण्याऐवजी उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगणंच पसंत केलं. त्यामुळं ठाणेकरांचे जे काही हाल होत आहेत त्यावर आपण त्यांच्यासह ठाणेकरांची माफी मागतो अशी उपरोधिक टीका जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत केली. ठाण्यामध्ये पाण्याचं नियोजन कोलमडून पडले असताना सत्ताधारी ठाणेकरांना धरण देऊ शकत नाहीत आणि नको त्या प्रकल्पांवर कोट्यावधींची उधळपट्टी करत असल्याचा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना केला.