जम्मू काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संजय रजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांतर्फे एक महिन्याच्या मानधनाची रक्कम पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झाले होते. त्यामध्ये दोन राज्यातील जवान होते. या शहीद जवानांच्या वीरपत्नी सुषमाबाई रजपूत आणि वंदना राठोड, वीरमाता सावित्रीबाई राठोड या सोहळ्यास उपस्थित होत्या. प्रत्येक सदस्याचं महिन्याचं १५ हजार रूपये मानधन याप्रमाणे १३१ नगरसेवक आणि ४ स्वीकृत नगरसेवक अशा १३५ नगरसेवकांच्या मानधनाची एकूण रक्कम २० लाख २५ हजार जमा झाली होती. ही रक्कम शहीद जवानांच्या कायदेशीर वारसास प्रत्येकी १० लाख साडेबारा हजार याप्रमाणे धनादेशाद्वारे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. खरे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत नागरिकांना मुलभूत सेवासुविधा देणं हे मुख्य काम असतं. पण शहीदांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आत्मियतेनं पुढे येणारी ठाणे महापालिका ही देशातली पहिली महापालिका असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं.