पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये पिंपळशेत गावातील एका महिलेनं गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्यानं पोरक्या झालेल्या तीन मुलींचं पालकत्व शिवसेनेनं स्वीकारलं आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच या गावात भेट देऊन या मुलींची विचारपूस केली आणि त्यांचं पालकत्व स्वीकारलं. या तिन्ही मुलींच्या नावानं पालकमंत्र्यांनी बँकेत ठेवी जमा केल्या आणि दोन मुलींना चांगल्या शाळेत घालून त्यांचा खर्च उचलला तर हांडवा यांच्या पडक्या घराच्या कामालाही त्यांनी सुरूवात केली. रूक्षणा आपल्या ४ मुलींसह पिंपळशेत गावातील खरोडा येथे राहत होती. जूनमध्ये तिच्या नव-यानं आत्महत्या केली होती. नव-याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची परवड सुरू झाली. त्याला कंटाळून रूक्षणानं घरी असलेल्या दोन मुलींना विष पाजलं आणि स्वत:ही आत्महत्या केली. पाचवीला असलेलं दारिद्र्य, लहान मुली, रोजगाराचा अभाव यामुळं पैसेही नाहीत, त्यामुळं कुटुंबाचं पोट कसं भरायचं या विवंचनेत त्या त्रासून गेल्या होत्या. रोजच्या जेवणाचीही भ्रांत असल्यानं त्यांनी दीपाली आणि वृषाली या आपल्या लहान मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. त्यांची मोठी मुलगी सुमन तिसरीत तर जागृती ही पहिल्या इयत्तेत शिकत आहे.