तिवरे धरण फुटण्याची निपक्ष चौकशी करावी, या चौकशीतूनच कोणते खेकडे छोटे आणि कोणते मोठे हे कळेल असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सांगितलं. श्रमिक जनता संघ आणि इतर असंघटित कामगारांच्या संघटनांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले २३ कायदे बदलले जात आहेत. समान कामाला समान वेतन मिळालेच पाहिजेयासाठी श्रमिक जनता संघ प्रामाणिक संघर्ष करत आहे. देशात खाजगीकरणाचे वारे जोरात वाहत आहेत पण कामगार आणि शेतकरी दोन्हीही संकटात आहेत. सार्वजनिक व्यवस्थेचं कंपनीकरण होत असून त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. सर्व भांडवलदार संघटित आहेत, त्यांचा रोज नफा वाढतो आहे, पण कामगारांचे उत्पन्न वाढत नाही पण कामगारांची सुरक्षा कमी होत असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला. समाजात अन्याय, विषमता आणि भ्रष्टाचार वाढत असताना एकलव्य पुरस्कार हा विषमतेला नाकारणारा आणि जाती, धर्माधारीत राजकारणाला प्रश्नचिन्ह लावणारा असल्याचं कौतुक मेधा पाटकर यांनी केलं. समता विचार प्रसारक संस्था आयोजित २८व्या एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमधील १०३ विद्यार्थ्यांपैकी ६६ विद्यार्थ्यांचा एकलव्य पुरस्कार देऊन मेधा पाटकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यातील २१ विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक भांडी काम, कंत्राटी काम करणारे आहेत.