शहरातील नालेसफाईचा बो-या वाजला असून थोड्याशा पावसातही शहरातील अनेक नागरी वस्त्या जलमय होत आहेत. त्यामुळं साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव वाढीस लागला असून ठाण्यात डेंग्युमुळं एका मुलीचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. नालेसफाईचे तीनतेरा वाजले आहेत. पावसाळ्यामध्ये गाळ रस्त्यावर साचत असल्यानं साथीचे आजारही बळावत असतात. गेल्यावर्षी अशा साथीच्या रोगांमुळे अनेकांचा बळी गेला होता. मात्र आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून एका १३ वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. या बळीस महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसतर्फे वर्तकनगर प्रभाग समितीसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी लहान मुलांना साथीच्या रोगांपासून वाचवता येत नसेल तर किमान बाहुलीला तरी वाचवा असं म्हणत निवेदनासोबत प्रतिकात्मक बाहुलीही प्रशासनाला दिली. डेंग्युनं बळी गेलेल्या मुलीच्या मृत्यूस पालिका प्रशासन आणि ठेकेदारच जबाबदार असल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.