ठाणेकरांच्याही ५०० चौरस फूटाच्या मालमत्तेवरील कर माफ करण्याचं उध्दव ठाकरे यांचं पुन्हा आश्वासन

मुंबईमध्ये ज्याप्रमाणे ५०० चौरस फूटाच्या घरांना करमाफी करण्यात आली तशी ठाण्यातही केली जाईल असं आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाणेकरांना दिलं. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महापालिका मुख्यालयासमोर झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी हे आश्वासन दिलं. काही लोकं या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाला मतं देऊ नका असं आवाहन करत फिरत आहेत. युतीला मत द्यायचं नाही तर मग कोणाला मत द्यायचं हे तरी सांगा असं विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाहीत अशी लोकं इतरांवर टीका करतात अशी टीका उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केली. गेल्या साडेचार वर्षात आम्ही टीका केली पण आता आम्ही दोघं एकत्र आलो आहोत. आपले जे मुद्दे आणि मागण्या होत्या त्या मान्य झाल्यानेच भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. देशासाठी काम करणा-यांबरोबर युती करायची नाही तर मग ती कोणाबरोबर करायची असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी उपस्थितांना तुम्ही युतीबरोबर आहात की नाही असं विचारलं. यावेळी उपस्थितांनी हात वर करून उध्दव ठाकरे यांच्या प्रश्नाला प्रतिसाद दिला. तर शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी उध्दव ठाकरे यांनी कल्याणात सभा घेतली. या सभेत देशाच्या सुरक्षेशी छेडछाड करणा-या नेत्यांचा निवडणूक लढवण्याचा मताधिकार काढून घ्या हीच खरी निवडणूक आचारसंहिता आहे अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली. ५६ पक्ष एकत्र येऊन जी आघाडी झाली आहे ती केवळ बिनबूडाचीच नसून बिनचेह-याचीही आहे. त्यांच्यातील प्रत्येकाला पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. हे सांगताना त्यांनी जनता सरकारच्या काळातील मोरारजी देसाई यांचं उदाहरणही दिलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading