जिल्ह्यातील महापालिका-नगरपालिकांना पाणी पुरवठा करणा-या धरणातील पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बराच कमी असल्याचं दिसत आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा, बारवी आणि इतर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून धरणामध्ये सध्या ३०७ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३३ टक्के पाण्याचा साठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी धरणामध्ये ३६९ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३९ टक्के पाण्याचा साठा होता. बारवी धरणाची क्षमता ही २३३ दशलक्ष घनमीटर असून आजघडीला धरणामध्ये ६६ दशलक्ष घनमीटर म्हणजे २८ टक्के पाण्याचा साठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी ९३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४० टक्के पाण्याचा साठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ७ ते १२ टक्के पाण्याचा साठा कमी असल्याचं दिसत असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.