विष्णूनगर मधील आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील वाद अद्यापही सुरू असल्याचं दिसत आहे. गुरूवारी रात्री या आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमशान झालं. त्यानंतर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंबा विक्री केंद्रावरील कारवाईच्या निषेधार्थ धरणं आंदोलन केलं होतं आणि कोणत्याही परिस्थितीत पुन्हा केंद्र उभारण्याचा निर्धार केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याप्रश्नी पालिकेकडे परवानगी मागितली होती. पालिकेनंही यासाठी आपली ना-हरकत दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा त्याच पदपथावर छोटं का होईना पण आंबा विक्री केंद्र उभारलं होतं. मात्र पुन्हा चक्रं फिरली आणि महापालिकेनं दिलेली ना-हरकत रद्द केली. त्यामुळं हे आंबा विक्री केंद्र पुन्हा काढण्यात आलं. मुख्यमंत्र्यांमार्फत दबाव आणून महापालिकेनं दिलेली परवानगी रद्द करण्याच्या कृतीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निषेध केला आहे.