वटपौर्णिमा उद्या आहे. उद्या दुपारी २ वाजून १ मिनिटापासून ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ होत असून सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत ज्येष्ठ पौर्णिमा आहे. वटपौर्णिमेचा दिवस निश्चित करण्यासाठी नियम असा आहे की, चतुर्दशीच्या दिवशी सूर्यास्ताच्या पूर्वी ६ घटिकाहून जास्त व्यापिनी पौर्णिमा असेल तर तो चतुर्दशीयुक्त पौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमेसाठी घ्यावा असा नियम ठरवण्यात आला आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. वटवृक्ष पूजेचा वेळेशी संबंध नाही. सूर्योदयापासून चतुर्दशीच्या कालातही वटवृक्षाची पूजा केली तरी चालते असं सोमण यांनी सांगितलं. वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या फांदीची पूजा करू नये. ज्याची श्रध्देनं पूजा करायची त्याला तोडून कसं चालेल. वटवृक्ष नसेल तर वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची पूजा करावी असंही सोमण यांनी सांगितलं. सत्यवान-सावित्रीच्या कथेमध्ये खरा पराक्रम सावित्रीचा आहे. सत्यवानाचा नाही. सावित्रीने मनाने वरलेल्या युवकाशीच विवाह केला. अडचणींवरती मात केली. तेव्हा या आधुनिक काळात केवळ आधुनिक सावित्रींनी उपास करण्याबरोबरच आधुनिक सत्यवानांनीही उपास करावा असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. वटसावित्रीच्या निमित्तानं पुरूषांनीही महिलांच्या कर्तृत्वाची, मेहनतीची दखल घेण्यास सुरूवात करावी.