शहापूर तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी ही ग्वाही दिली. शहापूर तालुक्यातील ९७ गावं आणि २५९ पाड्यांना टंचाईमुक्त करण्यासाठी भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला मान्यता देणं आवश्यक आहे. यासाठी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासोबत चर्चा करून या गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शहापूर तालुक्यातून मुंबई शहराला पाणी पुरवठा केला जातो. या तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१९-२० मध्ये प्रस्तावित आहे. याबाबत राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीनं मान्यता दिली असून प्रशासकीय मंजुरी मिळणं आवश्यक आहे. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करून ही गावं टंचाईमुक्त केली जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.