मराठी साहित्यातून महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवणारा ऐसी अक्षरे रसिके हा बहारदार कार्यक्रम मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सादर करण्यात आला. निलेश पवार, ज्ञानेश्वर नाईक, शिवराज धनावडे आणि तपस्या नेवे या तरूणांनी ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, रणजित देसाई, व्यंकटेश माडगूळकर, अरविंद जगताप अशा प्रतिभावान साहित्यिकांच्या कलाकृतींचे दर्शन घडवले. सावरकरांनी मराठीत वेशभुषा, मध्यांतर, महापालिका, नभोवाणी, त्वरीत, अहवाल असे अनेक नवीन शब्द देऊन मराठी भाषा समृध्द केली आहे असं ज्ञानेश्वर नाईकांनी सांगितलं. मराठी साहित्यातील माणिकमोती जपण्याचा आणि नव्या पिढीसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचं तपस्या नेवे यांनी सांगितलं. लोकांना साहित्याकडे वळवण्यासाठी आणि वाचन संस्कृती वाढवण्याकरिता दर महिन्याला एक साहित्यिक कार्यक्रम करण्याचा संकल्प ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयानं सोडला आहे.