ठाण्यातील हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करा असं आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियान आणि म्यूसनं केलं आहे. ठाण्यात दर एक तासाला एक झाड किंवा मोठा वृक्ष कापण्यात येतो. ठाणे महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण समितीला याबाबत कोणताही खेद वाटत नाही. मोठी वृक्ष लागवड केल्याचे दावे केले जातात. मात्र ही झाडं लावली कुठे, किती लावली, त्यातील किती वृक्ष जगले याची माहिती मिळत नाही. विकासकामात झाडं तोडावी लागतात वा पुनर्रोपित करायची आहेत असे सांगितले जाते. पण अशी झाडं, वृक्ष काढून कुठे लावली, लावलेली झाडं जगली का याचाही तपशील दिला जात नाही. कोलशेत येथे लोढा बिल्डरच्या गृह प्रकल्पात ३०० वर्षाचा वटवृक्ष आहे. या वृक्षाभोवती कॉन्क्रीटचं कंपाऊंड करून हा वृक्ष मारण्याचं काम सुरू आहे. हा वृक्ष वाचवणे ही एकप्रकारची वटपौर्णिमा असल्याचं ठाणे मतदाता जागरण अभियानाचं म्हणणं आहे. येत्या रविवारी १६ जून रोजी कोलशेत येथील या वटवृक्षाजवळ जमावं आणि वृक्ष बंधन करून वृक्ष वाचवण्याची शपथ घ्यावी असं आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियानानं केलं आहे.