ठाण्यातील रस्त्यांच्या दुतर्फा पडून असलेल्या बेवारस वाहनांवर महापालिका आणि वाहतूक शाखेनं जोरदार कारवाई सुरू केली आहे. विविध रस्त्यांवर अनेक वर्ष बेवारस वाहनं पडून असतात. अनेकदा ही वाहनं वाहतुकीला अडथळाही ठरतात. शहरातील रस्ते रूंद करण्यात आले असले तरी अनेकदा अशा रस्त्यांवर, पदपथांवर, मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, मैदानात अशा धूळ खात पडलेल्या बेवारसी गाड्या पहायला मिळतात. अशा बेवारस गाड्यांमध्ये लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रकारही घडले आहेत. भुरटे चोरही अशा गाड्यांचे सुटे भाग चोरून नेतात. असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेनं वाहतूक शाखेबरोबर या भंगार झालेल्या गाड्या उचलून नेण्याची मोहिम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसात ५० हून अधिक भंगार रिक्षा, दुचाकी, चारचाकी गाड्या उचलण्यात आल्या आहेत. अशा भंगारमध्ये पडलेल्या गाड्या उचलण्यासाठी गाडी असलेल्या ठिकाणाच्या मूळ पत्त्यासह गाड्यांची छायाचित्र टीसीएफएनजीओ वन ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आयडीवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.