ठाण्यात आज शून्य सावलीचा अनुभव नागरिकांना घेता आला. मराठी विज्ञान परिषद आणि विश्वास सामाजिक संस्थेतर्फे गावदेवी मैदानात शून्य सावली शो चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विज्ञान प्रेमी मोठ्या संख्येनं दुपारी १२ वाजता गावदेवी मैदानात जमले होते. यावेळी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी शून्य सावली दिवसाबद्दल माहिती सांगितली. बरोबर १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य डोक्यावर आला त्यामुळं आपली सावली आपल्या पायाखाली गेल्यानं शून्य सावलीचा अनुभव आला. यावेळी सोमण यांनी सर्वांना रिंगण करून उभं रहायला सांगितलं होतं. रिंगण केल्यानंतर एकमेकांचे हात एकमेकांना जोडल्यामुळे बरोबर खाली सावलीचं रिंगण झाल्याचं दिसत होतं. असा नयनरम्य अनुभव ठाणेकरांनी गावदेवी मैदानात अनुभवला. उत्तरायण, दक्षिणायन, सूर्य, सूर्यग्रहण याविषयीही माहिती सांगितली. यावेळी काही प्रयोग करण्यात आले. सिलेंडरची शून्य सावली होताना निरिक्षण करण्यात आले. शून्य सावलीचा अनुभव वर्षातून दोनदा येतो. १७ मे आणि २७ जुलैला शून्य सावलीचा अनुभव येतो. जुलैमध्ये पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे हा अनुभव घेता येत नाही पण मे महिन्यात मात्र लख्ख ऊन पडत असल्यामुळे शून्य सावलीचा अनुभव चांगला अनुभवता येतो असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.