ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे साडेतीन हजाराहून अधिक वृक्षतोडीच्या मंजुरींना मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती नंदरजोग आणि नितीन जामदार यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या रोहित जोशी यांनी या वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं या वृक्षतोडीस स्थगिती दिली असून १५ दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कायदे-नियम उच्च न्यायालयाच्या सूचना धाब्यावर बसवत सार्वजनिक हिताच्या विरूध्द काम करणा-या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला पुन्हा एकदा सणसणीत चपराक बसली आहे. वृक्ष प्राधिकरण समिती दोन वेळा बरखास्त करावी लागली होती. वृक्षतोडीच्या प्रस्तावावर वृक्षाधिका-यांचे टिपण, वृक्षअधिका-याचा स्थळ पाहणी अहवाल, बाधित झाडाचा फोटो, वय, उंची, झाडाचे जीपीएस लोकेशन इत्यादी संदर्भासकट वेबसाईटवर माहिती टाकणं, नागरिकांच्या हरकती, सूचना विचारात घेऊन त्यांना सुनावणी देणं अशा गोष्टींना सोयीस्कर बगल देत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मनमानी कारभार हाकणा-यांना जरब बसावा याकरिता असे निर्णय घेणं अपेक्षित होतं.