राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर राज्यातील पहिले भव्य महाराष्ट्र चित्रशिल्प उभारण्यात आलं आहे. या चित्रशिल्पाचं अनावरण नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते येत्या रविवारी होणार आहे. कधी काळी दलदल आणि अनधिकृत बांधकामांनी वेढलेल्या रेतीबंदरचा सुनियोजित पध्दतीनं विकास होत आहे. मुंब्रा वासियांसाठी रेतीबंदर येथे चौपाटी निर्माण करण्यात आली आहे. याच चौपाटीवर पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखवणारे महाराष्ट्रातील पहिले चित्रशिल्प चितारण्यात आले आहे. या चित्रशिल्पाची निर्मिती केदार घाटे यांची आहे. या चित्रशिल्पामध्ये जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराष्ट्र, संत तुकाराम, जोतिबा फुले, शाहू महाराज यांचे भित्तीचित्र चितारण्यात आलं आहे. २७ फूट रूंद आणि ४० फूट उंच आकारमानाच्या या शिल्पशिल्पाचं अनावरण येत्या रविवारी होणार आहे.